गोष्टी राक्षसांच्या

                                                                             राक्षस
   अन्विता, राक्षे काकांची एकुलती एक नात. दहा वर्षांच्या नातीला रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागत असे, मग ती झोपायची. काका नेहमी प्रमाणे देव आणि राक्षस म्हणजे दैत्य यांच्या गोष्टी सांगत. सगळ्या युद्धात देव विजयी आणि राक्षसांची हार हे सरळ सरळ असतंच पण आज नवीन पिढीच्या अन्विताने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ” आबा राक्षस म्हणजे काय हो? आणि नेहमीच ते वाईट वागणारे का असतात?  शक्ती असुनही का हारतात??  वाईटावर चांगल्याचा विजय हे बाळबोध विचार मनावर बिंबवले गेलेल्या काकांना असले प्रश्न ना कधी पडले, ना त्यांनी कधी विचारले. पण इथे तसं करून चालणार नाही हे लक्षात घेऊन काकांनी तिला समजेल, पटेल असे सोपे करून समजूत घालून पाठवले पण मनात मात्र किती तरी वेळ विचार करत राहिले,
    महिषासुर, रावण, मणी-मल्ल,इत्यादी अनेक राक्षसांची नावं आणि गोष्टी आपण लहान पणापासून ऐकत आलो आहोत. सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या राक्षसांचा वध करण्यासाठी मग देव अथवा देवी रूप घेते खूप मोठे युद्ध झाल्यावर तो राक्षस मारतो. पुराणातले हे राक्षस अनाचारी होते तरीही बलात्कार करून खून केल्याच्या, जाळून टाकल्याच्या गोष्टी ऐकिवात नाहीत. उलट रावणाने सीतेला स्पर्श सुद्धा केला नव्हता तो तिला स्वमताने समर्पित हो असेच म्हणत होता, म्हणजे आत्ताच्या कायदा असलेल्या जगात सुद्धा बलात्कार केला जातो  तोही माणूस म्हणवल्या गेलेल्या प्राण्याकडून??? हे अतिशय तिरस्करणीय आहे. पशु देखील आपले पशुपण सोडत नाहीत पण माणूस स्वतःचे माणूसपण सोडून बसला आहे. राक्षस राजे रावण,बळी हेसुद्धा आचरणाने शुद्ध होते जागृत राजे होते त्यांच्या पेक्षासुद्धा हीन पातळीवर माणूस आला आहे, किंबहुना रावण,बळी ह्याच्याशी त्याची तुलनाच शक्य नाही. राक्षस म्हणून त्यांनीही जी पातळी ओलांडली नाही ती पातळी माणसाने अनेकदा ओलांडली आहे. प्रत्येक बाबतीत अनाचार मजला आहे स्त्री ला सन्मान देणे हे शिकवूनसुद्धा जमत नाहीये हे माणूस म्हणून प्रत्येकाचे दुर्देव आहे. पालक, शिक्षक, सामान्य नागरिक,कायदा -सुव्यवस्था समाजातला प्रत्येक घटक अपयशी ठरलेला आहे स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलेला  आहे. दूर कुठेतरी घडलेली घटना बातमी म्हणून ऐकायची हळहळ मानायची आणि पान उलटायचे इतकेच सगळे करताहेत अगदी सगळेच फारच झाले तर कॅण्डल मार्च बस सपंली आपली जबाबदारी. प्रतिकार करणे विसरलाय माणूस. 
      निषेध नोंदवणे, लेख लिहून समाजाला जागृत करणे, न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ह्या करता सुजाण वकील,शिक्षक, न्यायाधीश, पत्रकार, लेखक ह्यांनी पुढे यायला हवे आणि सामान्य नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. जोपर्यंत माणूस माणसाच्या मागे खम्बिर पणे उभा राहत नाही तोपर्यंत असले गुन्हे थाम्बणार नाहीत. संस्कारहीन समाज सुसंस्कारित करणे हि सुद्धा पालक आणि शिक्षक तसेच प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पोलीस आणि वकील ह्यांनीही ह्या प्रकारच्या गंभीर गोष्टींची दखल   घेऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर केलीच पाहिजे. नैतिक व सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवले आणि घरातूनच स्त्रीयांचा सन्मान करण्याचे भान मुलांना दिले तर आणि तरच बदल होतील. खूप विचारांती काका मनाशी काही ठरवूनच उठले. नवीन पिढी चौकस आणि जागरूक आहे आणि त्यांच्या या बुद्धीला योग्य वळण लावणे ही आपल्या पिढीची जबाबदारी. आता फक्त गोष्टी सांगून थांबायचं नाही तर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून लहान मुलांना घडवायचे, योग्य काय आणि अयोग्य काय हे त्यांना समजेल, पटेल आणि रुचेल अशा प्रकारे रोज संध्याकाळी संस्कार वर्गाच्या माध्यमातून करायचे. गुन्हा घडूच नये म्हणून काळजी घेणे आहेच पण एखाद्याने तसे केलेच तर दिली जाणारी शिक्षाही कठोर आणि लवकरात लवकर व्हावी. शिवरायांनी ह्या गुन्ह्या करता हात-पाय कापून चौरंगा करून चौकात बसवण्याची दिलेली  शिक्षा सर्वात योग्य आहे अगदी आजच्या काळातही असेच वाटते कारण त्या व्यक्तीचे समाजासमोर एक उदाहरण राहील आणि पुन्हा कोणीही असे करण्याचे धाडस करणार नाही किमान परिणाम पाहून तरी. देव देवतांची पूजा करून कालिकेचे रूप घेऊन समाजातील स्रीयांनीच पुन्हा एकदा रुद्रावतार दाखवणे अनिवार्य झालेले आहे स्री शक्तीचा जागर करणे गरजेचे आहे.